Share/Bookmark

१८ सप्टें, २०१३

रुपया घसरतोय ? मग डॉलरमध्ये गुंतवणूक कशी कराल ?



अलिकडच्या काळात रुपयामध्ये झालेल्या तीव्र घसरणीमुळे भारतीयांच्या राहणीमानावर मोठा परिणाम होत आहे यात शंका नाही. 

महागाईमुळे सामान्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या असलेल्या घर, विवाह, उच्च-शिक्षण यांसह सर्वच छोट्या मोठ्या गरजा पुरवणे अधिक कठीण होत आहे. साहजिकच यापूर्वी दर महिन्याला शिल्लक पडणारी जी रक्कम बचत वा गुंतवणूक योजनांमध्ये जात होती ती कमी करावी लागत आहे. नेहमीच्या बचत योजना या महागाईवर मात करू शकत नाहीत हे ही उघड सत्य आहे. नोकरदार लोक ज्या उद्योगधंद्यांमध्ये काम करतात त्या उद्योगांनाही महागाईमुळे फायदा मिळवणे कठीण झाल्याने, नजिकच्या भविष्यात पगारवाढ, बोनस इ. मिळणेही कठीण होणार आहे. एकूणच या कठीण काळात महागाईवर मात करण्यासाठी खर्च कमी करण्याबरोबरच उत्पन्नाचे नवे स्त्रोत शोधणे गरजेचे बनले आहे.

सुरक्षित गुंतवणूकीचे पर्याय –

आतापर्यंत अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी सुरक्षित मानल्या गेलेल्या सोने आणि जमीन यामध्ये लोक गुंतवणूक करत होते. मात्र गगनाला भिडलेल्या जमीनीच्या भावांमुळे हल्ली जमीन वा स्थावर मालमत्ता खरेदी करणे अनेकांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. शिवाय त्यात लिक्विडीटी कमी असते. सोन्याचा भाव हा आंतरराष्ट्रीय म्हणजे डॉलरमधील भावाच्या उच्च पातळीवरून काहीसा खाली आला असला, तरी रुपयाच्या घसरलेल्या किंमतीमुळे भारतीयांसाठी मात्र सोने त्या प्रमाणात स्वस्त झालेले नाही. त्यातच सरकार भारतीयांच्या सोने खरेदीवर व आयातीवर या ना त्या प्रकारे मर्यादा घालण्याचा प्रयत्न करत असल्याने सामान्य गुंतवणूकदार संभ्रमात पडला आहे.

उच्च व्याजदर आणि त्यामुळे अडचणीत असलेले उद्योगधंदे आणि रुपयामधील उलथापालथीने शेअरबाजारात प्रचंड ‘व्होलॅटिलिटी’ आली आहे. त्यातच कमॉडिटी बाजारातील अलिकडेच उघडकीस आलेल्या घोटाळ्यामुळे एकूणच वातावरण गढूळ बनले असून, अनुभवी व कसलेले गुंतवणूकदारही आत्मविश्वास गमावत आहेत. २०१४ मध्ये होणा-या निवडणूकांपर्यंत असेच अनिश्चित वातावरण कायम रहाण्याची शक्यता आहे.

शेअरबाजारात अप्रत्यक्षपणे केल्या जाणा-या गुंतवणूकीबद्दल बोलायचे तर एस.आय.पी. योजना या दीर्घावधीसाठी फायदेशीर ठरत असल्या, तरी त्याही शेवटी शेअरबाजारावर अवलंबून असल्याने जेव्हा देशाच्या एकूण आर्थिक परिस्थितीबद्दलच शंका उत्पन्न होते, तेव्हा त्याबद्दलही आशा बाळगणे कठीण होत जाते.

ज्या थोड्या भारतीयांना परदेशातील नोकरी वा धंदे याद्वारे डॉलर वा तत्सम मजबूत विदेशी चलनांमध्ये उत्पन्न मिळते त्यांचे रुपयामधे रेमीट होणारे उत्पन्न हे रुपयाच्या घसरणीमुळे वाढल्यासारखे दिसत असले तरी तेही फसवे असून, भारतातील वाढलेल्या महागाईमुळे हे वाढीव उत्पन्न खर्च होवून जाणार असते.

निर्यातप्रधान कंपन्यांचे शेअर्स –

अशा परिस्थितीत नेहमी सुचविला जाणारा एक पर्याय म्हणजे, ज्या कंपन्यांचे उत्पन्न हे डॉलरमध्ये येते अशा, म्हणजेच आपल्या उत्पादने वा सेवांची निर्यात करणा-या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे हा होय. अलिकडच्या काळात आय.टी. क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये, रुपयाच्या तुलनेत महाग झालेल्या डॉलरमुळे वाढ झालेली दिसून येत आहे. उदा. जुलै च्या पहिल्या आठवड्यात १५०० रु.च्या आसपास उपलब्ध असणारा टाटा कन्सल्टन्सी या कंपनीचा शेअर ऑगस्ट अखेरीस म्हणजे फक्त दोन महिन्यात २००० रु. वर पोचला होता. इन्फोसीस, विप्रो, टेक महिंद्रा अशा इतर आयटी क्षेत्रातील मोठ्या कंपन्याही अशीच तेजी दाखवित आहेत. जेव्हा जेव्हा डॉलर वधारतो तेव्हा असेच चित्र दिसत असते. त्यामुळे एक प्रकारे रुपयाच्या घसरणीवर मात करण्यासाठी अशा कंपन्यांचे शेअर्स आपल्या पदरी असणे गरजेचे आहे.

आय.टी. क्षेत्राप्रमाणेच औषधी क्षेत्रांतील म्हणजेच फार्मा. कंपन्यांमध्येही अशी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो, मात्र औषधांच्या मार्केटींगमधील विविध देशांची धोरणे आणि त्यांचे परवाने यांचा या कंपन्यांच्या शेअर्सवर उलटसुलट परिणाम होत असतो. ऊदा. रॅनबॅक्सी लॅबच्या मोहाली येथून होणा-या उत्पादनावर यु.एस.एफ.डी.ए. ने बंदी घातल्याने अलिकडेच त्या शेअरमध्ये तीव्र घसरण झाली. तेव्हा साधारणपणे काहीशा अनिश्चित हालचाली करणा-या फार्मा. शेअर्सच्या तुलनेत आयटी कंपन्यांच्या शेअर्सना मी अधिक पसंती देईन.
डॉलरमध्ये थेट गुंतवणूक-

वधारणा-या डॉलरचा फायदा उठवून भारतातील महागाईवर काही अंशी मात करण्यासाठी अमेरिकन डॉलरमध्ये थेट गुंतवणूक करणे सामान्य भारतीयांना शक्य नसले, तरी एक पर्याय भारतातील गुंतवणूकदारांना उपलब्ध आहे, तो म्हणजे भारतीय स्टॉक एक्सचेंजेस वर ‘एन100’ नावाने उपलब्ध असणारा ‘ईटीएफ’ होय.

हा ‘एन100’ म्हणजे अमेरिकेच्या सुप्रसिद्ध ‘नॅस्डॅक-100’ या निर्देशांकावर आधारीत असलेला ईटीएफ असून, सर्वसाधारणपणे अमेरिकन शेअरबाजार आणि त्या देशाचे चलन हे समांतर वाढ दाखविण्याची शक्यता असल्याने नॅस्डॅक-100 हा डॉलरप्रमाणेच वधारत असतो. या अमेरिकन इंडेक्समध्ये कॉम्प्युटर हार्डवेअर-सॉफ्टवेअर, टेलीकम्युनिकेशन्स, रिटेल ट्रेड आणि बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रातील मोठ्या आकाराच्या अमेरिकन तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणा-या कंपन्यांचा समावेश आहे. या इंडेक्समध्ये प्रामुख्याने ऍपल, मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, गूगल, इन्टेल, अमेझॉन, ईबे, बायडू. स्टारबक, डेल यासारख्या जगप्रसिद्ध कंपन्या असून फायनान्स वा इन्वेस्टमेन्ट क्षेत्रातील कंपन्या मात्र यात नाहीत.

अशा प्रकारे अमेरिकन शेअरबाजारावर आधारीत अशा भारतातील पहिल्या ईटीएफ ची स्थापना मोतीलाल ओसवाल या भारतीय ब्रोकरेज कंपनीतर्फे २०११ मध्ये केली गेली, आणि सामान्य भारतीयांसाठी अप्रत्यक्षपणे का होईना, पण अमेरिकन शेअरबाजारात गुंतवणूक करण्याचा मार्ग खुला झाला. या एन100 मध्ये गुंतवणूक करणे, म्हणजे एकप्रकारे संपूर्ण जगातील सुप्रसिद्ध आणि निवडक कंपन्यांमध्ये एकाच वेळी गुंतवणूक करण्यासारखेच आहे. या कंपन्या विविध क्षेत्रांत काम करत असल्याने आपली गुंतवणूक ‘वेल डायव्हर्सिफाईड’ व म्हणून  स्थिरतेच्या दृष्टीने विश्वासार्ह आहेच, पण वरील कंपन्यांपैकी अनेक कंपन्या या भविष्यातही उत्तम कामगिरी करण्याची शक्यता असल्याने आपली गुंतवणूक चांगली वाढही दाखवू शकते. बीएसई व एनएसई या दोन्ही भारतीय एक्सचेन्जेसवर याचे व्यवहार करता येतात व याचा सिम्बॉल वा टिकर नंबर ‘N100’ असा आहे. कुठल्याही सर्वसाधारण शेअरप्रमाणेच याच्या अगदी एका यूनीटचीही खरेदी अथवा विक्री करता येते. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांना यात सहज व्यवहार करता येतात.

आता या एन100 ची प्रत्यक्ष बाजारातील भारतीय इंडेक्सच्या तुलनेतील कामगिरी कशी आहे ते पाहूया. एन100 भारतीय बाजारात एप्रिल २०११ मध्ये लिस्ट झाला तेव्हा त्याची किंमत सुमारे १०३ रु. होती. आज सप्टेंबर ’१३ मध्ये म्हणजे सुमारे अडीच वर्षानंतर तो २०० रु.च्या आसपास ट्रेड करत आहे. म्हणजेच अडीच वर्षांतच दुप्पट वाढ दाखवत आहे. याउलट आपला निफ्टी इंडेक्स हा एप्रिल २०११ मध्ये ५८५० च्या जवळपास होता म्हणजेच गेल्या अडीच वर्षांचा विचार करता निफ्टीने काहीही वाढ दाखविलेली नाही.

मार्च ते सप्टेंबर ’१३ या सहा महिन्यात डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण तीव्र होती. निफ्टीने या सहा महिन्यात विशेष वाढ दाखविलेली नाहीच, मात्र प्रचंड चढ-उतार मात्र दाखविले आहेत. या काळात भारतीय गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये केवळ या ‘व्होलॅटिलिटी’ने गिळंकृत केले आहेत. नेमक्या याच काळात एन100 ने मात्र चांगली कामगिरी केल्याचे दिसते. सहा महिन्यापूर्वी १५० रु. पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध असलेला एन100 आज २०० रु. चा आकडा दाखवित आहे. 

आता २००८ सालच्या मोठ्या मंदीनंतरच्या बदललेल्या जागतिक परिस्थितीतील नेमके चित्र जाणून घेण्यासाठी थोड्या अधिक काळाचा म्हणजे गेल्या ४ वर्षांचा विचार करूया. मात्र ४ वर्षांपूर्वी एन100 हा ईटीएफ अस्तित्वातच नसल्याने, तो ज्याच्यावर आधारीत आहे, त्या नॅसडॅक-100 या इंडेक्सच्या तुलनेत आपल्या निफ्टीची कामगिरी पाहूया. सुमारे ४ वर्षांपूर्वी सप्टेंबर २००९ मध्ये नॅस्डॅक इंडेक्स हा २१०० च्या जवळपास होता आणि आजची त्याची किंमत ३७५० आहे. म्हणजेच मंदीनंतरच्या चार वर्षांत नॅसडॅकने सुमारे पावणेदोनपट वाढ दाखविली आहे. याउलट सप्टेंबर २००९ मध्ये ४९०० च्या जवळपास असलेल्या निफ्टीने आजपर्यंत जेमेतेम सव्वापट वाढ दाखविली आहे.
  एन100 ची भारतीय बाजारातील सौद्यांची संख्या म्हणजेच ट्रेडींग ‘व्हॉल्युम्स’ हे अजूनही कमी आहेत. मात्र तरीही भारतीय गुंतवणूकदारांना जशी या पर्यायाची ओळख होत जाईल आणि महत्व पटेल तसे
बाजारातील व्हॉल्युम्स हे वाढत रहाणार आहेत.
‘गतकाळातील कामगिरी ही भविष्याची हमी होवू शकत नाही’ हे अगदी खरे असले तरी गेल्या सहा महिन्याप्रमाणे भविष्यातही जेव्हा जेव्हा रुपयाच्या तुलनेत डॉलर वधारेल तेव्हा घसरलेल्या रुपयामुळे होणारे आपले नुकसान काही अंशी तरी भरून काढण्यासाठी या एन100 मधील गुंतवणूकीचा उपयोग  होईल यात शंका नाही.       

Read more »